पिंपरी चिंचवड प्रतिनिधी: कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू झालेल्या आरतीने भक्तिमय वातावरण; “ज्ञानोबा तुकाराम” च्या जयघोषात निनादला परिसर!
रुपीनगर परिसर पहाटेपासूनच “ज्ञानोबा तुकाराम” च्या गजराने दुमदुमून जात आहे. कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू झालेली काकडा आरती आज भक्तिमय उत्साहाने सुरूच आहे. पहाटे पाच ते सात या वेळेत दररोज विठ्ठल नामस्मरणाचा अनोखा सोहळा रंगतोय
या आरतीत ह.भ.प. रणजित महाराज गरुड आणि ह.भ.प. आप्पासाहेब भालेराव महाराज यांच्या मंगल वाणीतून भक्तिभावाने ओथंबलेली भजने, गवळणी आणि अभंगांचा वर्षाव होतो आहे.
“पंढरीनाथा ये रे घरी, तुजविण काय मज भारी?” अशा सुरेल ओव्या आणि
“गाव गं पंढरी, वसा गं पंढरी” या गवळणींनी भाविक मंत्रमुग्ध होत आहेत.
आरतीच्या वेळी स्त्री-पुरुष, लहानगे, वयोवृद्ध सर्वजण विठ्ठलाच्या नामात हरवून जातात. “ज्ञानदेव तुकाराम” असा जयघोष होताच भाविक आनंदाने फुगडी घालतात, टाळ-मृदंगांच्या तालावर नाचतात, आणि विठुरायाच्या दर्शनाने आत्मिक समाधान अनुभवतात.
विशेष म्हणजे, रुपीनगरमधील प्रत्येक कुटुंबाला या आरतीत पूजेचा मान दिला जातो. त्यामुळे हा सोहळा एकतेचा आणि श्रद्धेचा प्रतीक ठरतो आहे.
आरतीनंतर प्रसाद म्हणून गरमागरम फळांचा शिरा आणि तुपाची वाटी भक्तांना दिली जाते, ज्याने भक्तांचा उत्साह अधिक वाढतो.
या उपक्रमामुळे रुपीनगरचे वातावरण काही दिवसांपासूनच अत्यंत भक्तीमय, मंगल आणि पवित्र झाले आहे. सकाळची सुरुवात विठ्ठलनामाने होत असल्याने सर्वांच्या मनात प्रसन्नता आणि सकारात्मकता अनुभवास येत आहे.
“काकडा आरती म्हणजे भक्तिभावाचा उत्सव, विठ्ठलाशी जोडणारा दुवा आणि समाजाला एकत्र आणणारा पवित्र सोहळा”, अशी भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली.
