Home पिंपरी चिंचवड दिंडी सोहळ्यातील भेदभाव कमी करणाऱ्या सत्याग्रहाचा पन्नासावा कार्यक्रम साजरा करणार : बाबा कांबळे

दिंडी सोहळ्यातील भेदभाव कमी करणाऱ्या सत्याग्रहाचा पन्नासावा कार्यक्रम साजरा करणार : बाबा कांबळे

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

आळंदीत वारकरी भूषण, समाज भूषण, समाज रत्न पुरस्कार प्रदान सोहळा

पिंपरी : प्रतिनिधी

आळंदीत दिंडी सोहळ्यातील जातीय विषमता संपवून समतेचा विचार जोपासणारा लढा उभारण्यात आला होता. त्‍याला यश आले आहे. संत रोहिदास, आजा मेळा, चोखामेळा या दिंड्या, दलित दिंड्या घोड्याच्या पुढे आणि मुख्य पालखी सोहळ्याच्या बाहेर चालत होत्या. त्यांना घोड्याच्या पाठीमागे व पालखी सोहळ्यामध्ये प्रवेश मिळावा, या मागणीसाठी १९७७–७८ साली सत्याग्रह करण्यात आला होता. या सत्याग्रहामुळे दलित दिंड्यांना मुख्य सोहळ्यामध्ये चालण्यास परवानगी मिळाली. त्‍यामुळे आळंदीत माऊलीच्‍या दर्शनाला येणारा प्रत्‍येक भाविक, वारकरी समतेचे विचार पुढे घेऊन जात आहे. समतेचा हा विचार तळागाळात रुजविण्यासाठी दिंडी साहेळ्यातील भेदभाव कमी करणाऱ्या सत्‍याग्रहाचा पन्‍नासावा उत्‍साहात साजरा करणार असल्‍याचे प्रतिपादन आळंदी येथील संत रोहिदास मठ व समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळेचे अध्यक्ष हभप बाबा कांबळे यांनी केले.

banner

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळ्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र आळंदी देवाची येथील संत रोहिदास मठ, हराळे वैष्णव समाज धर्मशाळाच्या वतीने आयोजित वारकरी भूषण समाज भूषण समाज रत्न पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने बाबा कांबळे बोलत होते. यावेळी हभप रामकृष्ण महाराज खाडे यांना वारकरी भूषण पुरस्कार, हभप रोहिदास साधू उगले यांना समाज भूषण पुरस्कार, तसेच सोनाबाई श्रीपती गाडेकर, अंकुश भिकाजी चव्हाण, नामदेव सदाशिव साळुंखे, भालचंद्र कोरेगावकर, खंडूसेठ बनसोडे, विश्वनाथ महादेव शेटे, मारुती बळीबा ढवळे, यांना समाज रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी संत रोहिदास मठ व समस्त हराळे वैष्णव धर्मशाळेचे कार्याध्यक्ष अनिल सातपुते, सचिव बाळासाहेब चव्हाण, ज्येष्ठ विश्वस्त श्री कुमार काळे, संत रोहिदास दिंडी क्रमांक 24 चे अध्यक्ष हभप सुरेश सोनवणे, पुजारी नारायण गाडेकर, संस्थेचे उपाध्यक्ष सुखदेव आबनावे, सुरेखा सुर्वे, विश्वस्त दत्तात्रय शिंदे, नारायण कोकाटे, सिद्धेश्वर सोनवणे, तुषार नेटके, उषा विश्वनाथ नेटके, डॉ. के. टी. कांबळे, लता गाडेकर आदीसह वारकरी, संत रोहिदास मठ व समस्त हराळे वैष्णव धर्मशाळेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सभासद, यावेळी उपस्थित होते.

बाबा कांबळे म्‍हणाले की, संत परंपरा ही महाराष्ट्रातील अत्यंत उज्वल व मोठी परंपरा आहे. आळंदी येथून निघणारी पालखी ही देशातील एकमेव समतेचे उदाहरण आहे. सामाजिक समता राखणारा हा सोहळा अनेक वर्षापासून सुरू आहे. संत ज्ञानेश्वर, संत रोहिदास, संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत गोरा कुंभार या संतांनी समाजातील चुकीच्या रूढी परंपरा अंधश्रद्धा संपवण्यासाठी आपल्या लेखणीतून जनतेला संदेश दिला.

पन्नास वर्षांपूर्वी या सोहळ्यामध्ये जातीभेद व भेदभाव पाळला जात होता. संत रोहिदास महाराज चोखामेळा, आजामेळा, या चर्मकार मातंग व महार समाजाच्या दिंड्या, या सोहळ्याच्या बाहेर घोड्याच्या पुढे चालत होत्या. यासाठी आळंदी मध्ये सत्याग्रह झाला. या दिंड्यांना मुख्य सोहळ्यामध्ये समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. यानंतर या दिंड्या मुख्य सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या. या घटनेला आता पन्नास वर्षे पूर्ण होतील.

या निमित्ताने आळंदी येथे या सत्याग्रहाच्‍या ५० वे वर्ष साजरे केले जाणार आहे. संत रोहिदास महाराज दिंडी क्रमांक 24, समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा व सर्व वारकरी भाविक भक्त यामध्ये सहभागी होतील. हा उत्‍सव साजरा करताना सामाजिक समता, जातिभेद विरोध, चुकीच्या रूढी परंपरा यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे, असे संत रोहिदास महाराज मठ तसेच समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळेचे अध्यक्ष हभप बाबा कांबळे म्‍हणाले.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?