Home शिरूरमहाराष्ट्र वर्षातील प्रत्येक सण हा पर्यावरणपूरक साजरा करा— महापौर रवि लांडगे

वर्षातील प्रत्येक सण हा पर्यावरणपूरक साजरा करा— महापौर रवि लांडगे

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी, (दिनांक २ मार्च २०२६) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपळे गुरव येथील शाळा क्रमांक ५४ मध्ये महापौर रवि लांडगे यांच्या संकल्पनेतून पर्यावरणपूरक होळी उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याबाबत जनजागृती व्हावी आणि सणांच्या माध्यमातून मूल्यशिक्षण रुजवावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी महापौर रवि लांडगे यांनी विद्यार्थ्यांना होळी सणाचे सांस्कृतिक, सामाजिक आणि पौराणिक महत्त्व समजावून सांगितले. होळीनंतर बदलणारे ऋतुचक्र, निसर्गाशी असलेले आपले नाते, तसेच भारतीय संस्कृतीत सणांचे असलेले स्थान याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. ‘होळी हा केवळ रंगांचा सण नसून वाईट प्रवृत्तींचा त्याग करून चांगल्या विचारांचा स्वीकार करण्याचा सण आहे,’ असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक विचारांची कास धरण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी शिक्षण विभागाच्या सभापती रविना आंगोळकर, नगरसदस्य ज्ञानेश्वर जगताप, शशिकांत कदम, पर्यवेक्षक ज्योती तापकीर, श्रीकांत चौगुले, शाळेच्या मुख्याध्यापिका गीतांजली पोळ, पांडुरंग मुद्गुन तसेच शिक्षक, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच प्रतीकात्मक स्वरूपात ‘फसवणूक, खोटं बोलणे, मोह, भांडणे, स्वार्थ, चोरी, अहंकार, चिडचिड आणि भ्रष्टाचार’ या नकारात्मक प्रवृत्तींची होळी पेटविण्यात आली. समाजात प्रामाणिकपणा, बंधुभाव, पर्यावरणप्रेम आणि सामाजिक जबाबदारी यांसारखी मूल्ये रुजविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

banner

पिंपळे गुरव येथील शाळा क्रमांक ५४ ही महानगरपालिकेची सर्वाधिक पटसंख्या असलेली शाळा असल्याचा उल्लेख करत महापौरांनी मुख्याध्यापक व शिक्षकांचे विशेष कौतुक केले. ‘महापालिका शाळा केवळ शिक्षण देत नाहीत, तर संस्कारही घडवतात,’ असे त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांनी ‘होळी लहान करा, पोळी दान करा’, ‘पर्यावरण रक्षक हेच मूल्यशिक्षण’, ‘नैसर्गिक रंग वापरा, पाणी वाचवा’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. महापौर रवि लांडगे नैसर्गिकरित्या तयार केलेल्या रंगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमवेत होळी साजरी केली आणि पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा आदर्श घालून दिला.

इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनींनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’, ‘माझा बाबा’ आणि ‘माझी मराठी’ या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच राधिका अग्रे हिने सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने प्रतिज्ञा घेतली की, ‘प्रत्येक वर्षी होळी नैसर्गिक रंगांच्या माध्यमातूनच साजरी करू,’ ही प्रतिज्ञा महापौरांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थी व पालकांनी घेतली.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?