वारकरी भावनेने न्हालेल्या विद्यार्थ्यांचा सहभाग; पालखी वारीत टाळ मृदंगाचा गजर, अभंग आणि प्रसादाचा उत्सव
पिंपरी चिंचवड | 5 जुलै 2025
ज्ञानदीप विद्यालयात आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने एक आगळावेगळा आणि भक्तिपर भरलेला अभिनव पालखी सोहळा उत्साहात पार पडला. या पालखी वारीचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्रितपणे वारकरी परंपरेची जपणूक करत भक्तिमार्गात सामील होणे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. पूजन सोहळ्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय श्री सुधाकरजी दळवी, सचिव माननीय श्री भसे सर, राजा शिवछत्रपती विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक चौधरी सर आणि शिंदे सर, संस्थेचे माजी खजिनदार दशरथ साहेब, सदस्य रमेश भालेकर, राक्षे सर, दारफळे साहेब, तसेच प्राचार्य श्री. सुनील गारगोटे सर आणि पर्यवेक्षिका सौ. वाणी मॅडम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
वारीमध्ये इयत्ता 6वी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. टाळ, मृदंग, अभंगाच्या गजरात वारी “विठ्ठल नामाचा जयघोष” करीत पुढे सरकली. मार्गामध्ये मोकाशे परिवाराच्या घरी थांबून पादुकांची पूजा झाली आणि विद्यार्थ्यांना बिस्किटाचा प्रसाद देण्यात आला.
यानंतर वारीने दक्षता मंदिरात विसावा घेतला. येथे माननीय गंगापूरे साहेबांकडून लाडूंचा प्रसाद, तर मारुती मंदिरातर्फे चॉकलेट व गुळाचा गरम चहा देण्यात आला. हा भक्तिभावाचा अनुभव विद्यार्थ्यांच्या मनावर एक अमिट ठसा उमटवणारा ठरला.
शेवटी वारी विद्यालयात परतली आणि येथे श्री. वावरे सरांच्या पुढाकाराने साबुदाणा चिवडा व शेंगदाण्याचा स्वादिष्ट फराळ देण्यात आला. सर्व शिक्षक आणि प्राचार्यांनी वारीत सहभाग घेत टाळ, ढोलकीच्या गजरात अभंग गायन करत, विद्यार्थ्यांसमवेत एक अविस्मरणीय अनुभव साजरा केला.
कार्यक्रमाचे सुंदर आणि प्रभावी सूत्रसंचालन सौ. ज्योती गागरे मॅडम यांनी केले. शेवटी सर्व मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचे मनःपूर्वक आभार मानून “राम कृष्ण हरी”च्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता झाली.
