Home पिंपरी चिंचवड महात्मा फुले यांचा स्त्रीशिक्षणाचा विचार आजही मार्गदर्शक; महापौर रवि लांडगे यांचे प्रतिपादन

महात्मा फुले यांचा स्त्रीशिक्षणाचा विचार आजही मार्गदर्शक; महापौर रवि लांडगे यांचे प्रतिपादन

महापालिकेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन...

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी,(दिनांक ११ एप्रिल २०२५)–क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी स्त्रीशिक्षणाचा जो पाया घातला, तो भारतीय समाज परिवर्तनाच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा ठरला. त्या काळात स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि महिलांना ज्ञानाच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला. आज स्त्रिया शिक्षणाच्या बळावर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती करत असून प्रशासन, शिक्षण, विज्ञान, उद्योग, क्रीडा तसेच सामाजिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहेत. ही प्रगती महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या विचारप्रवाहाचेच फलित आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस तसेच पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकातील त्यांच्या पुतळ्यास महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये तसेच पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकात झालेल्या अभिवादन कार्यक्रमास महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिक्षण समिती सभापती रविना अंगोळकर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, नगरसदस्य धर्मपाल तंतरपाळे, कुशाग्र कदम यांच्यासह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता विनय ओहोळ, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर म्हणाले, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांचा त्याग, त्यांचे सामाजिक कार्य आणि समतेसाठी दिलेला लढा अतुलनीय असून भारतीय समाजाला दिशा देणारा आहे. त्यांनी शिक्षण, स्त्री-मुक्ती आणि सामाजिक न्यायाच्या माध्यमातून जे परिवर्तन घडवून आणले, ते आजही प्रेरणादायी आहे. अशा महापुरुषांचे विचार आणि साहित्य केवळ स्मरणदिनापुरते मर्यादित न राहता ते पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांमध्ये या विचारांची रुजवण होणे गरजेचे असून त्यासाठी शैक्षणिक स्तरावर नियोजनबद्ध प्रयत्न होणे आवश्यक आहे. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वाचन उपक्रम तसेच विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या कार्याची आणि विचारांची ओळख करून दिल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक परिणाम होईल.

banner

आयुक्त विजय सूर्यवंशी यावेळी म्हणाले, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सामाजिक समतेच्या आणि शिक्षणाच्या कार्याला अभिवादन करताना, त्यांच्या विचारांचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. पिंपरी येथील भीमसृष्टी परिसरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या स्मारकाचे काम हे केवळ एक विकासकाम नसून, ते समाजप्रबोधनाचे आणि प्रेरणेचे केंद्र म्हणून उभे राहणार आहे. या स्मारकाचे काम प्राधान्याने व गतीने पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक ती सर्व प्रशासकीय कार्यवाही करण्यात येत असून, हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

*चौकट – क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे महापौर यांच्या हस्ते उद्घाटन*
क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘सामाजिक समता सप्ताह’ व ‘विचार प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत पिंपरी येथील सावित्रीबाई फुले स्मारक येथे महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध महत्त्वपूर्ण प्रसंगांचे दर्शन घडविणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन दि. ११ ते १५ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.

या प्रदर्शनामध्ये दोन्ही महापुरुषांच्या कार्याचा, सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याचा आणि त्यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी क्षणांचा वेध घेणारी छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली असून, नागरिकांना त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा जवळून परिचय करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन. पिंपरी चिंचवड (दिनांक १४ एप्रिल २०२६) डॉ. आंबेडकरांनी भारतात आणि परदेशात आपले शिक्षण पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्या मिळवल्या, तसेच ६४ हून अधिक विषय आणि ११ भाषांवर प्रभुत्व प्राप्त केले—जे त्यांच्या काळातील एक अतुलनीय विद्वत्तापूर्ण यश होते. डॉ. आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषित वर्गाच्या उन्नतीसाठी समर्पित केले. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून, त्यांनी भारतीय राज्यघटनेला आकार देण्यात, मूलभूत हक्कांची हमी देण्यात आणि लोकशाहीचा पाया घालण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून त्यांचे योगदान कायद्यापुरते मर्यादित नव्हते—त्यांनी लैंगिक समानता, कामगार सुधारणा आणि सर्वांसाठी शिक्षणाचा पुरस्कार केला. १९९० मध्ये, राष्ट्रासाठी केलेल्या त्यांच्या अफाट सेवेचा गौरव म्हणून त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आला. डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले की ज्ञान हेच खरे सक्षमीकरण आहे आणि प्रत्येक व्यक्ती, तिची पार्श्वभूमी काहीही असली तरी, सन्मानास पात्र आहे. समानता, न्याय आणि सर्वांप्रति आदर यावर आधारित समाजाचे त्यांचे ध्येय आपण पुढे नेऊया. असे निरूपण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील स्मारक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खराळवाडी, पिंपरी येथील मध्यवर्ती कार्यालयात देखील शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना माजी नगरसेवक ॲड.गोरक्ष लोखंडे म्हणाले, आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. भारत सरकारच्या विविध समाजकल्याणकारी योजनांचे मोठे श्रेय आंबेडकरांच्या कार्यास जाते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढून शिक्षण, संघटना आणि संघर्षाचा मंत्र दिला. त्यांनी अस्पृश्यता निवारण, महिला हक्क आणि शोषितांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांचे विचार आजही तरुण पिढीला प्रेरणा देत राहतील. तसेच सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, कार्याध्यक्ष फजल शेख, विजय लोखंडे, मा. नगरसेवक पंडीत गवळी,ॲड गोरक्ष लोखंडे, प्रकांश सोमवंशी, राजेंद्र जगताप, शेखर चिंचवडे, नगरसेविका वर्षा जगताप, योगिता बारणे, प्रदेश ओबीसी कार्याध्यक्ष ॲड. सचिन औटे, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, अकबर मुल्ला, उपाध्यक्ष शक्रुल्ला पठाण, कुमार कांबळे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, संभाजी बारणे, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, महिला उपाध्यक्षा भाग्यश्री मस्के, सरचिटणीस नीलम कदम, देवी थोरात, राजू चांदणे, सुरेंद्र सिंग बाला, चंदू हलगी, समीर थोरात, महेंद्र तापकीर, अभिजीत आल्हाट, धनाजी तांबे, सुनिल अडागळे इ. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?